काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ॲन्टाॅप हिल येथील लाॅयड्स इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान १२ ते १५ वाहनांचं नुकसान झालं होतं. या दुर्घटनेमुळे इमारतीला तडे जाऊन ही इमारत राहण्यायोग्य नसल्याचं मत नोंदवत रहिवाशांनी पर्यायी जागेची मागणी केली आहे. परंतु या इमारतीला सध्या तरी कुठलाही धोका नसून दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तसंच इमारतीच्या स्थैर्यावरील परिणाम पडताळून बघण्यासाठी मुंबई आयआयटीतील तज्ज्ञांची नेमणूक केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी दिली. आमदार अबू आझमी यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
कोर्ट कमिश्नर शांतीलाल जैन यांनी परिसराची पाहणी करुन इमारतीला कुठलाही धोका नसून रहिवाशांना घरांचा ताबा घेता येईल, असा अहवाल महापालिकेला दिला आहे. दोस्ती रियाल्टी या विकासकाने ५० मजली इमारतीसाठी पाया खोदण्याचे काम केल्यामुळे जवळच्या लॉईड्स इमारतीच्या आवारातील जमीन खचल्याने दोस्ती रियाल्टीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी सुरु असताना राज्य सरकारला स्वतंत्र चौकशी करता येत नसली तरी लोकप्रतिनिधींच्या भावना उच्च न्यायालयाला अवगत केल्या जातील. तसंच आयआयटी, पवई, मुंबई यांच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. त्याच बरोबर इतर इमारतीच्या आजूबाजूचा भाग खचत असल्यास त्यावर नियंत्रणाच्या सूचना दिल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
गेल्याच महिन्यात मुसळधार पावसात अॅन्टॉप हिल परिसरातील लॉयड्स इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत खचली होती. या दुर्घटनेत जवळपास १५ कार दबल्या होत्या सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बांधकामाविषयी स्थानिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. शेजारील दोस्ती बिल्डरच्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप केला होता.
हेही वाचा-
मुंबईत महापालिका अधिकारी अन् बिल्डरांची 'दोस्ती'- निरूपम
घाटकोपरमध्ये कल्पतरु ऑरा सोसायटीची संरक्षक भिंत खचली