सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भाजप विधीमंडळात बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार की नाही? अशा चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच पुरेसं संख्याबळ नसल्याने भाजपने नामुष्की टाळण्यासाठी घेतलेली ही माघार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा- राष्ट्रवादीचा गटनेता कोण? संभ्रम अजूनही कायम
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन भाजपला पाठिंबा दिला होता. पवार राष्ट्रवादीचे गटनेते असल्याने राज्यपालांनी हे पत्र ग्राह्य धरत भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानुसार शनिवार रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली होती.
त्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांना विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी जयंत पाटील यांची निवड केली. परंतु पवार अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते असून त्यांना व्हिप काढण्याचा अधिकार नसल्याचा दावा भाजप नेते करत असताना अचानक पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते.
हेही वाचा-
काँग्रेसने महिन्याभराने निवडला विधीमंडळ गटनेता, बाळासाहेब थोरात यांची निवड
व्हिप म्हणजे काय? गटनेता कसं ठरवणार सरकारचं भवितव्य?