दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दूध संकलन झालं तरी दूध वाहतूक रोखत मुंबईला दूध पोहचू द्यायचं नाही, यासाठी शेट्टी गनिमी काव्याचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळेच राज्यभर दूध टँकरलाच आंदोलकाकडून टार्गेट केलं जातं आहे. इतकंच काय तर खुद्द शेट्टी रस्त्यावर उतरले असून सरकारची कोंडी करण्यासाठी मुंबईत गुजरातहून दूध आणण्याचा प्रयत्न हाणून पडण्यासाठी मंगळवारी सकाळपासून गुजरातच्या सीमेवर ठाण मांडून आहेत.
सरकारच्या नाकीनऊ आणत मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शेट्टीचा हा प्रयत्न आहे. दरम्यान गुजरात सीमेवर बसलेल्या शेट्टींना चकवा देत सरकारनं दूध एक्स्प्रेस गुजरातमधून सोडली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी ही दूध एक्स्प्रेस रोखण्यासाठी आपण आता डहाणूकडे रवाना होत असून कुठल्याही परिस्थितीत दूध रोखू असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तर मला अटक करून दाखवा असंही आव्हान त्यांनी सरकारला केलं आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
सोमवारी, 16 जुलै पासून दूधकोंडी आंदोलनला सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यभर आंदोलक रस्त्यावर उतरले असून दुधाचे टँकर अडवणं, फोडणं, आग लावणं असे हिंसक प्रकार आंदोलकांकडून सुरू आहेत. तर हे प्रकार रोखण्यात सरकारला म्हणावं तसं यश येताना दिसत नाही. त्यातच हा प्रश्न सोडणवण्यासाठीच्या बैठका ही निष्फळ ठरत आहेत. दरम्यान आता यावर गुरुवारी बैठक होणार आहे. त्यामुळे दुधकोंडी अशीच सुरू राहणार आहे.
मुंबईकराना दूध कमी पडू दिलं जाणार नाही, मुंबईला पुढचे काही दिवस पुरेल इतकं दूध आहे, असं सरकारकडून सांगितलं जात आहे. पण दूध मुंबईत पोहोचू नये हाच प्रयत्न आंदोलकांचा आहे. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच सरकारला आता मुंबईच्या दुधाची चिंता वाढल्यानं गुजरातवरून दूध आणलं जात आहे. पण गुजरातच्या सीमेवरच शेट्टी ठाण मांडून बसल्यानं सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यावर उतारा म्हणून सरकारनं आता चक्क रेल्वेतून मुंबईत दूध आणण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध एक्स्प्रेस रोखण्यात येणार आहे. याशिवाय उद्यापासून रस्त्यावर जनावरं सोडून महामार्ग रोखणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तेव्हा हे आंदोलन आता काय रुप धारण करतं हेच पाहणं महत्त्वाच ठरेल.
हेही वाचा -