कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू किंवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळून आल्यास संबंधित दुकानाचा परवाना तातडीने रद्द करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले. मंत्रालयात प्लास्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत कदम यांनी हे निर्देश दिले.
राज्यात ई-कॉमर्ससाठी लागणाऱ्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियलला केवळ ३ महिन्यांसाठी विक्रीची परवानगी दिली होती. ही मुदत संपल्याने दुकानदारांनी प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल ऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. गणपती उत्सवाच्या काळात थर्माकोलवर १०० टक्के बंदी होती. तसंच नवरात्र, दसरा आणि दिवाळीतही थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, असं यावेळी कदम म्हणाले.
आतापर्यंत राज्यात २९० टन प्लास्टिक जप्त करण्यात आलं आहे. गुजरातमधून राज्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येत असून पोलिसांनी प्लास्टिकचे ट्रक जप्त करावेत. पर्यटन आणि देवस्थानच्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. तिथंही पोलिस आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असं आवाहन कदम यांनी केलं.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या तयार करुन त्या दुकानांवर आणि ग्राहकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. लवकरच २५ लाख पिशव्या तयार होत असून त्या बाजारात उपलब्ध होतील. यापुढे राज्यभर दौरा करुन प्लास्टिक संदर्भात महसूल निहाय आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा-
निवडणूक फंडासाठी प्लास्टिक धोरण, राज यांचा आरोप
प्लास्टिकबंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू; आदित्य ठाकरेंचा निरूपम यांना टोला
टपालवाडी वॉटरफॉल परिसरातून ७५० किलो कचरा साफ