मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्य सरकार आता ७२ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी सज्ज झालं आहे. बुधवारी यासंदर्भातील शासकीय अध्यादेश (जीआर) जारी करण्यात आला. एकाच टप्प्यात होणारी ही भरतीप्रक्रिया जलदगतीने मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात 'वाॅर रूम' देखील बनवण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभाग भरती प्रक्रियेत उपलब्ध होणाऱ्या जागा कशा रितीने विभागून देण्यात येतील याचा अभ्यास करत आहे. पूर्वी ही भरती प्रक्रिया एकूण २ टप्प्यांत होणार होती. परंतु आता ही भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात होणार असल्याने राज्य सरकारकडून या प्रक्रियेसंदर्भात पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही मेगा भरती होणार आहे.
मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्षण देण्यात आलं आहे. त्यानुसार या मेगाभरतीत मराठा समाजासाठी खुल्या वर्गातील ४८ टक्क्यांमधून १६ टक्के जागा आरक्षीत ठेवण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारला मेगा भरतीची ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे २ टप्प्यांत प्रत्येकी ३६ हजार जागांची भरती करण्याऐवजी एकाच टप्प्यात ७२ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
खूशखबर! ७२ हजार पदांच्या मेगाभरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात
नव्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा- मुख्यमंत्री