राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली. गेली चार वर्षे आपण प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, पण आता या जबाबदारीतून मुक्त केलं तर बरं होईल, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. तटकरे यांच्या निर्णयाने राष्ट्रवादीच्या गोटात चर्चेला उधाण आलं आहे.
नाणार विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरूवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी प्रदेश अध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी केल्याचं सांगत खळबळ उडवून दिली. यापुढे पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नाणार प्रकल्पासाठीच्या जमीन संपादनाचा अध्यादेश रद्द झाल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई जाहीर करतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देसाई यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगतात. मत्र्यांना वैयक्तिक मत असतं हे १५ वर्षांत पहिल्यांदाच कळल्याचं म्हणत तटकरे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
तर, नाणारवरून सेना-भाजपा जनतेला मूर्ख बनवत असून या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी मध्येच मुंबईच्या विकास आराखड्याचा विषय तर आणला नाही ना अशी शंका आपल्या मनात येत आहे. मुख्यमंत्री विकास आराखडा मंजूर झाल्याचं ट्विटरवरून सांगतात तर सचिव त्याची माहिती देतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
हेही वाचा-
तटकरेंविरोधात गाडीभर पुरावे देणारे मुख्यमंत्रीच करणार त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
तटकरेंच्या अडचणीत वाढ? सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल