दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन या कंपनीला भारतात तोटा होत असल्यानं ही कंपनी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्होडाफोन कंपनीला सतत तोटा होत असल्याचं वृत्त असून, याबाबत एका वृत्तसंस्थेनं वृत्त दिलं आहे. परंतु, कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही वर्षांपूर्वी रिलायन्स जिओनं दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य अशा सुविधांमुळं इतर दूरसंचार कंपन्यांचं धाबे दणाणले होते. तर काही कंपन्यांना या शर्यतीत टिकल्या नाहीत. त्यामुळं त्यांनीही आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता.
काही कंपन्या बंद झाल्या आहेत. रिलायन्स जिओच्या या सुविधेमुळं व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं मर्जरही झालं. त्यानंतर आता व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्रित सेवा पुरवत आहेत. दरम्यान, वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळं कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये व्होडाफोनने आपले लाखो ग्राहक गमावल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. तसंच या तिमाहीतही कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यातच कंपनीची स्टॉक मार्केट व्हॅल्यूदेखील कमी होत आहे. जून २०१९ मध्ये कंपनीला जून २०१८ च्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ४ हजार ६७ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता. ३१ डिसेंबर २०१८ रोजी एनसीएलटीच्या मंजुरीनंतर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं विलीनीकरण झालं होतं. त्यानंतर व्होडाफोन-आयडिया अशी नवी कंपनी स्थापन झाली होती.
हेही वाचा -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी १०२ दिवस बंद
भेंडी बाजार परिसरातील इमारतीला आग