अमृतसरमधील रावण दहनाच्या वेळेस रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या ६० हून अधिक जणांना रेल्वेने चिरडल्याची घटना आठवली, तरी आजही अंगावर काटा उभा राहतो. मुंबईतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून रेल्वे ट्रॅकवरील अपघातांची संख्या सातत्याने वाढतच आहे. रेल्वेतून पडून वा ट्रॅक ओलांडताना मृत्यू झाल्याच्या बातम्या रोजच वाचायला मिळतात. असं असताना माहिती अधिकाराखाली एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या ५ वर्षांत म्हणजेच २०१३ पासून आॅगस्ट २०१८ पर्यंत मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर १८ हजार ४२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८ हजार ८७४ जण जखमी झाले आहेत. याकडे पाहता रेल्वेचे ट्रॅक मृत्यूचे ट्रॅक बनत आहेत का? असाच प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहात नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी सप्टेंबरमध्ये रेल्वे प्रशासनाकडे २०१३ पासून आतापर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर पडून वा ट्रॅक ओलांडताना किती लोकांचा मृत्यू झाला? तसंच किती जण जखमी झाले? याची माहिती मागितली होती. त्यानुसार रेल्वेनं २०१३ ते आॅगस्ट २०१८ या ५ वर्षांच्या काळात एकूण १८ हजार ४२३ जणांनी रेल्वे ट्रॅकवर पडून वा रेल्वे ट्रॅक ओलांडताना आपला जीव गमावल्याची माहिती दिली आहे. तर अशा अपघातांत १८ हजार ८४७ जण जखमी झाल्याचंही सांगितलं आहे.
माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये ३५०६ लोकांचा मृत्यू झाला असून ३३१८ जण जखमी झाले आहेत. २०१४ मध्ये मृत्यूचा आकडा ३४२३, तर जखमींचा आकडा ३२९९ असा होता. २०१५ मध्ये बळी गेलेल्यांचा आकडा ३३०४ तर जखमींचा आकडा ३३४९ असा होता. २०१६ आणि २०१७ मध्येही बळींचा आणि जखमींचा आकडा वाढताच राहिला आहे.
२०१६ मध्ये ३२०२ जणांचा तर २०१७ मध्ये ३०१४ जणांचा बळी गेला. तर २०१६ मध्ये ३३६३ जण तर २०१७ मध्ये ३३४५ जण जखमी झाले. २०१८ आॅगस्ट साल संपायचं असलं तर या ८ महिन्यांच्या काळात अर्थात आॅगस्ट २०१८ पर्यंत १९७४ जणांचा रेल्वे ट्रॅकवर पडून वा ट्रॅक ओलांडताना मृत्यू झाला आहे. तर ८ महिन्यांत २१७३ जण जखमी झाले आहेत.
ही आकडेवारी धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे. रेल्वे ट्रॅकवर पडून वा ट्रॅक ओलांडताना अशाप्रकारे हजारो प्रवाशांचा जीव जाणंही गंभीर बाब असून शकील अहमद यांनी रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले असतानाही याची अंमलबजावणी रेल्वे कडून का होत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
तर मुंबईकरांचा जीव वाचवायचा असेल तर रेल्वेनं आणि रेल्वेमंत्र्यांनी याकडे त्वरीत गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा-
माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवरून घसरली
रुग्णवाहिकेअभावी प्रवाशाची ६ तास मृत्यूशी झूंज; रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय