सुपरफास्ट आणि अत्याधुनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करताना 45 हून अधिक प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
याप्रकरणी रेल्वेकडून जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय, हे कशामुळे घडलं यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. विषबाधा झाल्यामुळे 27 प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एक्स्प्रेस क्रमांक 22120 मध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याच्या बातमीला रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल सक्सेना यांनीही दुजोरा दिला आहे. याप्रकरणी संबंधीत कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असल्याचंही सक्सेना यांनी सांगितलं. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी कोणत्याही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही. घटनेमागील कारण स्पष्ट होण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
करमाळीहून सकाळी साडेनऊ वाजता सुटलेल्या सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्ता म्हणून ऑम्लेट, कटलेट, केक आणि सूप दिले होते. नाश्ता झाल्यानंतर दीड तासाने दोघांना त्रास होऊ लागला. त्यानंतर रत्नागिरीपर्यंत 24 जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यानंतर बाधित प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. शिवाय या प्रकरणी कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -
'तेजस'मध्ये घ्या आता विकतचेच हेडफोन!