टाटा समूहात परतण्यास स्वारस्य नसल्याचं आता समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री म्हटलं आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदासंबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर सायरस मिस्त्री यांच्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
टाटा समूहाच्या अध्यक्षपदी आणि समूहातील कंपन्यांच्या संचालक मंडळावर मिस्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या राष्ट्रीय कंपनी लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर टाटा समूहाच्या अध्यक्षपदासह अन्य कोणत्याही पदावर परतण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचं मिस्त्री यांनी म्हटलं आहे. मिस्त्री म्हणाले की, टाटा समूहात कोणाच्याही वैयक्तिक लाभापेक्षा कंपनीच्या हितास महत्त्व दिले जाते. सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरवली जात आहे. गैरसमज दूर करण्यासाठी मी हे स्पष्टीकरण देत आहे.
कंपनी लवादाने माझ्या बाजूने निर्णय दिला असला तरी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्षपद किंवा टीसीएस, टाटा टेलिसव्र्हिसेस, टाटा इंडस्ट्रीज यांच्या संचालकपदासाठी मी इच्छुक नाही, असं मिस्त्री यांनी म्हटलं. समूहाच्या भल्यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे. मात्र, अल्प भागधारक या नात्याने असणारे सर्व अधिकार राखण्यासाठी आणि संचालक मंडळात स्थान मिळवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
घरबसल्या म्युच्युअल फंडात करा 'अशी' गुंतवणूक
नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक