‘गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये ५ दिवसाच्या बाप्पांचं बुधवारी मुंबईत विसर्जन करण्यात आलं. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणानं विसर्जन सोहळा पार पडला. तसंच, भक्तांनी नैसर्गिक विसर्जन स्थळांसह कृत्रिम स्थळांवर मुंबई महापालिकेचे नियम पाळून बाप्पाचं विसर्जन केलं.
मुंबईत संध्याकाळी ९ वाजेपर्यंत सार्वजनिक २९६, घरगुती १२६२२ अशा १२,९१८ मूर्तींचं विसर्जन झालं. यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाच्या २१९ तर घरगुती ७,०६४ अशा ७,२८३ मूर्तींचे विसर्जन झाले. महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगर अशा सर्व ठिकाणच्या कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत ७० नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी व्हावी यासाठी पालिकेच्या २४ विभागांमध्ये सुमारे १७० कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्यात आले. विसर्जन स्थळी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त होता. विसर्जन स्थळी तराफे, जीवरक्षकांची व्यवस्था केली होती. त्याशिवाय, आरोग्याशी संबंधित सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची काळजी प्रशासनानं घेतली होती.
हेही वाचा -
गुड न्यूज! मुंबईबाहेरील पुनर्विकासाला चालना, MMR साठी वेगळं ‘एसआरए’
पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १९० नवीन कोरोना रुग्ण