Advertisement

ब्रिटिशांच्या काळात एका मराठी माणसाने उभारले पहिले बंदर


ब्रिटिशांच्या काळात एका मराठी माणसाने उभारले पहिले बंदर
SHARES

बोटींनी आणि माणसांनी नेहमीच गजबजलेला भाऊचा धक्का... मुंबईची अविस्मरणीय खूण म्हणून भाऊचा धक्का ओळखला जातो. मुंबईची कहाणी ही भाऊच्या धक्काच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मुंबईतल्या प्रत्येकाला भाऊचा धक्का माहित असेल. पण भाऊचा धक्का बांधण्यामागे कुणाचा हात आहे? याला भाऊचा धक्का हे नाव कसे पडले? हे क्वचितच कुणाला माहित असावे


अरे... कुठल्या तरी भाऊने हा धक्का बांधला असावा म्हणून सहाजिकच त्यांचे नाव धक्क्याला देण्यात आले, असेच तुमचे उत्तर असेल. तुम्ही लावलेला अंदाज अगदी बरोबरही आहे पण भाऊंचे खरे नाव काय? ब्रिटिशांच्या काळात त्यांनी हा धक्का कसा उभारला? याच्या मागचा रंजक इतिहास वाचायला तुम्हालाही नक्कीच आवडेल.


रायगड जिल्ह्यातील उरणमधल्या कारंजा गावात १७८८ साली लक्ष्मण अजिंक्य यांचा जन्म झाला. १८०१ साली त्यांचे कुटुंब गावातून मुंबईत आले. पण काही दिवसात लक्ष्मणजींच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर पडली. लक्ष्मण हे हुशार आणि मेहनती होते. त्यामुळे त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या गन कॅरिएज कंपनीत नोकरी लागली.   



कसे पडले 'भाऊ' हे नाव?

कॅरिएज कंपनीत एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी माणसाला क्षुल्लक चोरीसाठी सर्वांसमोर फटके खावे लागणार या विचाराने लक्ष्मण अस्वस्थ झाले. लक्ष्मण यांनी तोफखाना विभागातील वरिष्ठ कॅप्टन रसेल यांच्याकडे त्या मराठी माणसाला माफ करावे, अशी क्षमायाचना केली. रसेल यांनी त्या मराठी माणसाची शिक्षा माफ केली. यामुळे रसेल यांच्या मनात लक्ष्मण अजिंक्य यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. अनेक कामगारांच्या मदतीला लक्ष्मण धावून यायचे. त्यामुळे सर्वजण त्यांना आदराने 'भाऊ' संबोधू लागले



भाऊचा धक्का बांधण्यामागील रंजक इतिहास

लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल या मराठी बांधकामतज्ज्ञांनी १८४१ साली भाऊचा धक्का सागरी वाहतुकीसाठी बांधला. मुंबई बेटावर मालाची वाहतूक जलमार्गे फार पूर्वीपासून होत असे आणि आजही होते. पण १८३६ पर्यंत मुंबईच्या किनाऱ्यावर माल उतरवण्यासाठी धक्काच नव्हता. त्यामुळे मुंबई किनाऱ्यावर माल उतरवणे खूप कठिण जायचे


मुंबई बेटावर समुद्रमार्गे होणारी मालाची आणि प्रवाशांची वाहतूक मचवे-गलबत्ताद्वारे होत असे. रात्रभर आगबोटीतून समुद्री प्रवास करायचा. त्यानंतर मचव्यातून माल किंवा प्रवासी चिखलांनी भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यांवर यायचे. यासर्वात मालाची ने-आण करण्यास अधिक परिश्रम आणि वेळ जात असे. त्यामुळे मुंबईत व्यापार करता यावा आणि प्रवाशांसाठी बंदर उभारण्याची गरज इंग्रजांना भासू लागली. पण सरकारचा खजिना रिकामा होता. म्हणून ज्यांची ऐपत असेल त्यांना मालकी हक्काने बंदरं बांधावीत, असे अर्ज सरकारने मागवले. तेव्हा लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांनीसुद्धा एक अर्ज पाठवला. भाऊंच्या अर्जाला काही अटींवर मंजूरी देण्यात आली आणि त्यांच्याकडून बंदर बांधण्याचा आराखडा मागवण्यात आला



भाऊंनी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करताना समुद्राच्या भरती-ओहोटी आणि एकूणच पर्यावरणाचा अभ्यास केला होता. मातीचा भराव टिकणार नाही म्हणून कचऱ्याचा भराव घालण्याची भाऊंची संकल्पना होती. पाण्याने ओला झाल्यावर कचऱ्याचा लगदा बनतो हे भाऊंना माहित होते. कचरा विल्हेवाटीचे कंत्राट भाऊंकडे पूर्वीपासूनच होते. त्यामुळे त्यांनी कचऱ्याचा भराव समुद्रात टाकला. पण इंग्रजांनी लीज करारात वारंवार बदल केल्याने भाऊंच्या अडचणीत वाढ होऊ लागली


पण या कठिण परिस्थितीत भाऊंच्या अडचणी जाणून तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांनी ६ टक्के चक्रवाढ व्याजांनी दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यामुळे त्यांच्या कामाला गती आली. कर्जाचे ओझे शिरावक घेऊन अखेर भाऊंनी चार वर्षात बंदराचे काम पूर्ण केले. एवढचे नाही तर येणाऱ्या-जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखारही उभारली. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था, माल वाहतुकीसाठी रोड, सुरक्षित तटबंदीची बांधणी मोठ्या कल्पकतेने करण्यात आली. दळणवळण सोईस्कर झाल्यामुळे अनेकांना रोजगार मिळाले


कव्हर फोटो सौजन्य



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा