परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागली. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फूल टू धम्माल! बच्चे कंपनीसोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्रत्येकाचा काही ना काही तरी प्लॅन नक्कीच असेल. तेवढाच काय तो विरंगुळा. कुटुंबियांसोबत मस्त एक आठवडा कुठेतरी भटकंती करायला जायचं आहे. मुंबईच्या जवळचं एखादं डेस्टिनेशन असलं तर बरं. पण नेमकं जायचं कुठे? कसं जायचं? आणि कसं असेल ते ठिकाण? अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मग ही आहेत मुंबई जवळची अशी काही ठिकाणं जिथे तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत मस्त एन्जॉय करू शकता!
पाचगणी हे नाव त्याच्या सभोवताली असलेल्या पाच डोंगरांवरून पडलं आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची महाबळेश्वरपेक्षा फक्त ३८ मीटर कमी म्हणजे १,३३४ मीटर आहे. पाचगणी हे एक निवासी थंड हवेच्या ठिकाणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. जुन्या ब्रिटिश इमारती, पारशी घरं, एक शतक किंवा त्याहूनही अधिक काळ चालत आलेली निवासी विद्यालयं याची छाप आजही इथे जाणवते. घनदाट हिरव्या वृक्षराजीचं छत्र लाभलेल्या छोट्या रस्त्यांमधून रमतगमत फिरत निसर्गसौंदर्याची मजा इथे लुटायला मिळेल.
डोंगर माथ्यावरील पठारावर उभं राहून पश्चिमेकडे नजर टाकलीत तर समुद्रसपाटी प्रदेशाचं दर्शन घडतं. जास्त गर्दी नसणारं आणि मनाला आल्हाद देणारे पाचगणी प्रत्येक पर्यटकाला खोलवर भावणारं एक दुर्लभ ठिकाण आहे. निसर्गप्रेमींनी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी.
पाचगणीहून ३ कि. मी.दूर सिडनी पॉईंट आहे. उंच पठारावरून छोट्या छोट्या वाड्या, दरीतून वळणं घेत जाणारी कृष्णा नदी आणि कमलगड किल्ला तुमच्या दृष्टीस पडेल.
शांतीमय असं वातावरण तुम्ही इथं अनुभवू शकता. जर तुम्हाला बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर धोम डॅमला नक्की भेट द्या. स्कूटर बोटिंग, स्पीड बोट अशा इतर अॅक्टीव्हिटीदेखील तुम्ही अनुभवू शकता.
तुम्हाला धार्मिक ठिकाणी भेट द्यायची असेल तर पाचगणीतील मंदिर उत्तम पर्याय आहे. हे कृष्ण मंदिर असून १३ व्या शतकात याची बांधणी झाली होती. यादव आणि राजा सिंगणदेव यांनी या सुंदर अशा मंदिराची निर्मिती केली आहे.
योग्य काळ : सप्टेंबर ते मार्च
कसं जायचं? : मुंबईहून २४५ कि. मी.दूर आहे. विमानानं किंवा रेल्वेनं तुम्ही पुण्याला येऊ शकता. पुण्यावरून बससेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईवरून पाचगणीला येण्यासाठी महाड मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही खाजगी वाहनानं देखील पाचगणी गाठू शकता. मुंबई-पुण्याहून राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवा आणि खाजगी बसेस देखील उपलब्ध आहेत.
समुद्रसपाटीपासून १ हजार ३७२ मीटर उंचीवर असणारं निसर्गानं नटलेलं शहर म्हणजे महाबळेश्वर! स्वच्छ तलावात नौकाविहार करण्याचा आणि मासे पकडण्याचा आनंद काही वेगळाच. याशिवाय नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या पायवाटांमधून तुम्ही भ्रमंती करू शकता. महाबळेश्वरला जवळपास ३० पॉईंट्स आहेत. हे सर्व पॉईंट्स पूर्ण करायचे म्हणजे तुमच्याकडे दोन ते तीन दिवस असलेच पाहिजेत. एका दिवसात हे ३० पॉईंट्स पूर्ण करणं अशक्यच आहे.
महाबळेश्वरवरून २४ कि.मी. दूर प्रतापगड आहे. इथंच अफझल खानवर शिवाजी महाराजांनी कौशल्यानं मात केली.
महाबळेश्वरच्या मुख्य शहरात असलेलं हे शिव मंदिर आहे. १६व्या शतकात या मंदिराची स्थापना करण्यात आली.
महाबळेश्वरचं आणकी एक आकर्षण म्हणजे वॅक्स म्युझयम. फक्त कला प्रेमीच नाहीत, तर बच्चे कंपनी देखील इथं भेट देऊ शकते.
महाबळेश्वरमधील सनसेट पॉईंट हा 'मुंबई पॉईंट' म्हणून ओळखला जातो. मुंबईला जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर हा सनसेट पॉईंट आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ ही या ठिकाणी भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.
योग्य काळ : ऑक्टोबर ते जून
कसं जायचं? : मुंबईहून २६३ किलोमीटरवर महाबळेश्वर आहे. पुणे विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरून जाणं देखील सोईस्कर आहे. वाठार हे रेल्वे स्टेशन सर्वात जवळ म्हणजेच ६२ कि.मी. दूर आहे. पण सोयीचं नाही. एसटी बसेस मुंबई आणि पुण्याहून सुटतात.
पन्हाळ्याचा इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास. पण मराठेशाहीच्या आठवणी देणाऱ्या गोष्टींशिवाय इथे असं बरंच काही आहे जे तुम्हाला आकर्षित करेल. समुद्रसपाटीपासून ९७७ मीटर उंचीवर पन्हाळा आहे. तुम्हाला निसर्गसौंदर्याबरोबरच उत्साहदायी असं शांत वातावरण इथं अनुभवता येणार आहे.
मराठ्यांनी काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीनं आणि पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्ल्याला १२०० वर्षांचा इतिहास आहे.
महालक्ष्मी मंदिर या नावानं देखील हे मंदिर ओळखलं जातं. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक हे मंदिर आहे.
पावनखिंडीची लढाई ही मराठा इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगड जवळील पावनखिंड इथं झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षिततेसाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी इथे हौतात्म्य पत्करलं. तेव्हापासून मूळ 'घोडखिंड' नाव असलेल्या या जागेला 'पावनखिंड' म्हटलं जाऊ लागलं.
विशाळगडाची बांधणी १०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी केली. हा गड 'किल्ले खेळणा' या नावानेही ओळखला जातो. शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये हा किल्ला जिंकला आणि त्याचे नामकरण 'विशाळगड' केले.
कसं जायचं? : मुंबईहून ४२८ कि.मी. दूर पन्हाळा आहे. कोल्हापूर हे जवळचं विमानतळ आहे. मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा नुकतीच चालू करण्यात आली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचं कोल्हापूर हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. कोल्हापूर पासून पन्हाळा १६ कि.मी. असून इथे जायला एसटीची बससेवा आहे. कोल्हापूरहून टॅक्सी हा देखील पर्याय आहे.
चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन असेही म्हणतात. चिखलदऱ्याचा उल्लेख महाभारतात येतो. त्यावरून एक लोककथा देखील प्रचलित आहे. पांडव वनवासात असताना दुष्ट किचकाचा भिमानं वध केला आणि त्याला इथल्या दरीत फेकून दिलं. म्हणून हे स्थान 'किचकदरा' या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे किचकदराचा अपभ्रंश चिखलदरा झाला. विदर्भातील हे एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. याशिवाय महाराष्ट्रातील कॉफी उत्पादनाचंही हे महत्त्वाचं ठिकाण आहे. चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे इथली हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते.
देवी पॉईंट चिखलदरा गावापासून १ किलोमीटरवर आहे. शेवटी काही पायऱ्या उतरून इथं जाता येतं. डोंगरातील एका भुयारात ही देवी वसलेली आहे. तिच्या डाव्या बाजूला चंद्रभागा नदीचा उगम आहे.
भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. धामणगाव मार्गे रस्त्यानं चिखलदऱ्यास जाताना हे ठिकाण लागतं. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या बाजूला दरीच्या सुरुवातीला भीमकुंड हा झरा आहे. यालाच 'किचकदरा' असेही संबोधतात.
चिखलदऱ्यापासून ८ कि.मी. अंतरावर वैराट पॉईंट आहे. वैराटकडे जाताना दोन्ही बाजूकडे सातपुड्याच्या उंच-उंच पर्वतरांगा दिसतात. महाभारत काळात ही वैराट राजाची नगरी होती. म्हणून या जागेला 'वैराट' असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. इथलं विशेष म्हणजे या ठिकाणाहून सूर्यास्त पाहण्याची मजा वेगळीच आहे.
सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला आहे. या किल्यात आजही राणी महाल आणि मशिद अस्तित्वात आहे. तेला-तुपाच्या टाक्या देखील आहेत. या टाक्या खोल असून त्यांत विभागणी केलेली आहे. युद्धकाळात तेलतूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असत. बाजूला असलेल्या जंगलात चंदन आणि सागाच्या झाडांची दाट पसरण आहे.
कसं जायचं? : यासाठी अकोला हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. शिवाय अमरावती स्टेशनवरून जाता येईल. मुंबईहून रस्त्यानं ७६३ कि.मी.वर चिखलदरा आहे. तुम्ही राज्य परिवहन सेवेच्या बसने किंवा खासगी गाडीनं देखील जाऊ शकता.
अलिबागहून बारा मैलावर उत्तरेकडे मांडव्याचा अतिसुंदर निवांत समुद्र किनारा आहे. इथे फारशी वर्दळ नसते. मांडवा गाव स्वत:चं खास व्यक्तिमत्व जपून आहे. नारळीच्या बागांनी समृद्ध असा हा शांत परिसर आहे. तुम्हाला थोडा वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर किहिमच्या सागर किनाऱ्यावरील तंबूमध्ये व्यास्तव्य करून पाहा.
कुलाबा किल्ला हा मुंबई शहरापासून ३५ कि.मी.दक्षिणेला अलिबागजवळ आहे. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक 'किल्ले कुलाबा'. कुलाबा किल्ल्यात उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, दर्गा, इतिहासकालीन तोफा अशी ठिकाणं आहेत.
कसं जायचं? : मुंबईहून १३६ कि.मी. अंतरावर किहिम बीच आहे. गेट वे ऑफ इंडियाहून तुम्हाला बोटीनं जाण्याचा पर्याय आहे.
हेही वाचा