आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानं लहानपणी आई-वडिलांच्या किंवा थोरा-मोठ्यांच्या तोंडून एक वाक्य नक्कीच ऐकलं असेल..'आळस हा माणसाचा शत्रू आहे'! पण खरी गंमत म्हणजे, लहानपणी वाटणारा हा शत्रू आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसा आपला सगळ्याच चांगला मित्र बनतो! कसा?
एखादं काम आपल्याला करायचं असतं. आपण ते त्याच दिवशी करायचं पक्क ठरवतो. पण नंतर सहज डोक्यात विचार येतो की हे काम उद्या केलं तर काय हरकत आहे. मग हाच विचार आपल्या डोक्यात घोळायला लागतो. हळूहळू तो विचार निर्णयाच्या दिशेने सरकू लागतो. आणि मग शेवटी त्याच दिवशी करायचं ठरवलेलं काम दुसऱ्या दिवसावर जातं. आपली आळसाशी मैत्री चांगली असली, तर मग दुसऱ्या दिवशीही हेच घडतं. ही मैत्री अधिक घट्ट असली, तर मग तिसऱ्या दिवशीही हेच घडतं. आणि अगदी जिवापाड मैत्री असली, तर मग काय, रोजच हे घडतं!
याचं अगदी प्रत्येक घरात हमखास घडणारं उदाहरण म्हणजे जिम..व्यायाम! 'उद्यापासून मी जिमला जाणार आहे' या वाक्यातला उद्या कित्येक आठवडे येतच नाही. काहींसाठी कित्येक महिने, तर काहींच्या आयुष्यात कधीच नाही!
आता हा सगळा ऊहापोह करण्याचं कारण म्हणजे 10 ऑगस्ट हा दिवस जगभरात 'आळस दिन' म्हणून पाळला जातो. खरं वाटत नसलं, तरी हे खरं आहे! या आळसाशी मैत्री होण्यात जसा आपला स्वभाव कारणीभूत असतो, तशाच अन्य काही बाबीही कारणीभूत असतात. कोणत्या?
आळस येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचा आहार. आपण जेवणात किती पौष्टिक आहार घेतो यावर तुमच्या शरीराचा ताळमेळ अवलंबून असतो. आपल्याकडे वेळ नसल्याने आपण सकस आहार घेण्याऐवजी जंकफूड, फास्टफूडकडे वळतो. पण त्यामुळे वजन वाढते आणि त्याची सवय लागते. जेवणात हिरव्या भाज्या, डाळी, मासे खायला हवे. अनेकदा तुमचे पाचनतंत्र चांगले राहण्यासाठी केळी खाणे योग्य असल्याचे सांगितले जाते. पण केळी जास्त खाल्ल्यास आळस वाढतो.
कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफर्ड युनव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा आळसाच्या बाबतीत जगात 39 व्या स्थानावर आहे. चालण्याच्या बाबतीत भारतीय लोक प्रचंड कंटाळा करतात. त्यातही महिलांचे चालण्याचे प्रमाण खूपचे कमी आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
आळशीपणा घालवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे तसा संकल्पच केला पाहिजे. आणि जो संकल्प केला आहे तो अंमलातही आणला पाहिजे. कठीण व्यायाम करण्यापेक्षा सोपे व्यायाम केल्यानेही आळस कमी होऊ शकतो.
हेही वाचा -
व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!