तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तापेचावर पहिल्यांदाच भाष्य करत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरील दावा चुकीचा असल्याचं वक्तव्य केलं. शिवसेनेसोबत बंद दाराआड काय चर्चा झाली होती? याचा खुलासा करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
लोकसभा निवडणुकीआधी अमित शहा यांच्यासोबत मातोश्री निवासस्थानी झालेल्या चर्चेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद तसंच सत्तेत निम्मा वाटा, असा फाॅर्म्युला ठरल्याचा दावा शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आला. भाजप हा दावा अमान्य करत असल्याने भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करण्यास शिवसेनेने नकार दिला. परिणामी महायुतीला कौल मिळूनही राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली.
हेही वाचा- महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला ठरला? 'असं' होईल सत्तेचं वाटप
शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, ज्या अमित शहांसोबत ही चर्चा झाली, तेच चित्रातून गायब होते. विधानसभा निवडणुकीपासून अद्यापपर्यंत त्यांच्या तोंडून याबद्दल एक चकारही निघाला नव्हता. परंतु या सर्व प्रकारावर अमित शहा पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.
शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही ठरलेलं नव्हतं. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं निवडणुकीआधी वारंवार सांगण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वारंवार आपल्या भाषणात याबद्दलची घोषणा केली होती. मात्र, त्यावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नवीन मागण्या घेऊन समोर आली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आम्ही कधीही मान्य करणार नाही. असं सांगताना शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? हे सांगण्यास मात्र नकार दिला. भाजपची ती संस्कृती नसल्याचे शहा म्हणाले. तसंच भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केलेला नसून शिवसेनेने भाजपचा साथ सोडल्याचं शाह यांनी सांगितलं.
शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास पुरेसा वेळ देण्यात आला नाही, या प्रश्नावर शहा यांनी स्पष्ट केलं की सत्ता स्थापन होण्यासाठी राज्यपालांनी १८ दिवस वाट बघितली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक पक्षाला मुदत दिली. परंतु दिलेल्या मुदतीत एकाही पक्षाला सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही. आता तर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी ६ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी जाऊन सत्ता स्थापन करावी, असा टोलाही शहा यांनी हाणला.
हेही वाचा-
..तेव्हाच शिवसेनेसोबत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका
अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू