रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत ६ बळी गेले असून मुंबई महानगर प्रदेशातील रहिवासी खड्ड्यांनी अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांसोबतच राजकीय पक्षांनीही आक्रमक होत खड्ड्यांविरोधात जागोजागी आंदोलन छेडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही खड्ड्याचा मुद्दा उचलून धरत सोमवारी थेट बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून खळखट्याक केलं.
सायन-पनवेल महामार्गावर सनी विश्वकर्मा नावाच्या तरूणाचा नुकताच बळी गेला होता. तर त्याचा मित्र कमलेश यादव गंभीर जखमी झाला होता. याच मुद्यावरून आक्रमक होत सोमवारी नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं. या प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते नितीन चव्हाण, श्याम ढमाले, विशाल भिलारे, राजेंद्र खाडे आणि नितीन खानविलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सायन-पनवेल मार्गासह नवी मुंबईतील सर्वच रस्त्यांवर खड्डे असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक बळी जात आहे. त्याचवेळी महापालिका असो वा सार्वजनिक बांधकाम विभाग वा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कुणीही याकडे लक्ष देत नाही असं म्हणत मनसेनं खड्ड्यांविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला असून आता या प्रश्नी माघार नसल्याचं म्हणत हे आंदोलन असंच सुरू राहील, अशी माहिती नवी मुंबईतील मनसे नेत्यांनी (नाव न छापण्याच्या अटीवर) 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
मनसेनं खड्ड्याचा मुद्दा आता नव्हे, तर सुरूवातीपासूनच उचलून धरल्याचंही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी खड्डे असताना झोपेचं सोंग घेणाऱ्या महापालिकेला जागं करण्यासाठी मनसेने आंदोलन हाती घेतल्याचंही मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
त्याचाच भाग म्हणून गेल्या आठवड्यात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात होड्या सोडल्या होत्या. तर खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा घेत विजेत्यांना कमळ आणि धनुष्यबाण बक्षीस म्हणून दिलं होतं. एवढंच नव्हे, तर नवी मुंबईतील खड्ड्यांना चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, प्रविण पोटे असं नाव मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहेत.
गोरेगाव पश्चिमेकडे मनसे विभाग प्रमुख विरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयावर संताप मोर्चा काढला. रस्त्यावर पडलेले खड्डे, जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, पाणी तुंबण्याची समस्या या विषयी महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही महापालिका त्यावर कारवाई करत नसल्यामुळे हा संताप मोर्चा काढण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे काही वेळ एसव्ही रोड वर वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
हेही वाचा-
खड्ड्यात जावो जनता, आम्हाला नाही चिंता
मुंबईच्या रस्त्यांवर उरलेत ३०० खड्डे