मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या लगत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी करणाऱ्या मनसेकडूनच आता या फेरीवाल्यांचे त्वरीत पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे याला विलंब होत असून याची तातडीने अंमलबजावणी न केल्यास होणाऱ्या परिणामांना आपल्या सर्वांना सामोरे जावे लागेल, अशी भीतीही मनसेने आयुक्तांकडे व्यक्त केली आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक मनीष चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी हाती घेण्यात येणारी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावी, याबाबतचे निवेदन दिले. यामध्ये त्यांनी रेल्वे स्थानकाच्या जागेतील फेरीवाल्यांना पूर्णपणे हटविले गेले नसल्याची तक्रार करून या १५० मीटर क्षेत्रातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन ३ मीटर क्षेत्रातच केले जावे, अशी मागणी केली आहे.
फेरीवाल्यांचा सर्वे करून त्यांची संगणकीय माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु, फेरीवाल्यांसाठी राबवण्यात येणारी योजना आद्यपही कार्यान्वित न झाल्याने अधिकृत फेरीवाल्यांना उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. फेरीवाले २ ते ३ पिढ्यांपासून राहत आहेत. मुंबईतील अनेक मराठी फेरीवाले हे नियमात बसत असून केवळ महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे या योजनेची अंमलबजावणी होत नसून परिणामी त्यांची उपासमार होत असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा
दुकानांसमोर फेरीवाला बसल्यास दुकानदारांवर कारवाई