मुंबईमधली लोकलची गर्दी सर्वांच्याच मनात धडकी भरवणारी आहे. मात्र या गर्दीतही कधीकधी प्रवास सुखकर होऊ शकतो. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना सध्या काहीसा असाच सुखद अनुभव येतोय.
रेल्वेजवळील परिसर म्हणजे फलाटावर किंवा जिन्यावर नेहमीच कोणीतरी कचरा टाकताना दिसतं. तर कुणी पान खाऊन पिचकाऱ्या मारताना दिसतात. पण गेल्या आठवड्यात मुंबई सेंट्रलच्या रेल्वे ब्रिजवर मला एक वेगळंच चित्र पहायला मिळालं. हे चित्र पाहिलं तर तुम्हाला देखील सुखद धक्का बसेल.
रेल्वे ब्रिजवर कडेला असलेले फलक तुम्हाला वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले दिसतील. कुठे मुंबईचा वडापाव तर कुठे इडली विकणारा अण्णा पाहायला मिळेल. तर कुठे मुंबईची बेस्ट बस तर कुठे अथांग समुद्राचा फिल देणारी, मुंबईची एकता दर्शवणारी अशी वेगवेगळी पेंटिग्स इथं पहायला मिळत आहेत.
'मुंबई फर्स्ट' या संस्थेतर्फे मुंबई सेंट्रल स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे. मुंबई फर्स्टच्या या कामात 'द सॉल्यूटेड स्टोर' आणि रेल्वेनं देखील साथ दिला. मुंबई सेंट्रलवर रेखाटण्यात आलेल्या या चित्रांना आधी रेल्वेकडून हिरवा कंदिल मिळाला. त्यानंतरच ही चित्र प्रत्यक्षात साकारण्यात आली. या संकल्पनेत अनेक मुंबईकर देखील सहभागी झाले होते.
२०१६ प्रमाणे आम्ही २०१८ मध्ये देखील मुंबईचा कायापालट करणार आहोत. यावेळी आम्ही ३६ रेल्वे स्टेशन रंगवणार आहोत. मुंबईकरांसोबतच वेगवेगळ्या कॉलेजच्या तरूण-तरूणी देखील यात सहभागी झाल्या होत्या.
- डॉ.नेवील शहा, सीईओ, मुंबई फर्स्ट
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर रेखाटण्यात आलेली ही चित्रं पाहून तुमच्या डोळ्यांची पारणं फिटतील. मुंबई फर्स्टच्या सदस्यांनी आणि तरूण-तरूणांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यावर पान, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्यापूर्वी विचार करावा. सुंदर मुंबईचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येकाची साथ आवश्यक आहे.
हेही वाचा -