शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप नाणार रिफायनरीकरीता भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली नाही. परिणामी शिवसेनेने अाक्रमक पवित्र घेत तुतिकोरिनसारखा संघर्ष महाराष्ट्रात टाळायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात एक पत्र शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलं आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या स्वाक्षरीचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. नाणारधील रिफायनरीला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे.
त्यामुळे जनभावना लक्षात घेऊनच याप्रकल्पाबाबत भूमिका घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. प्रकल्पाच्या विरोधात उग्र होत चाललेलं आंदोलन तसंच जनतेवर प्रकल्प न लादण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन याची आठवण या पत्रात मुख्यमंत्र्यांना करून देण्यात आली आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव सादर करण्याची उद्योग सचिवांना सूचना केली होती. तसा प्रस्ताव करण्याची अनुमती मिळावी म्हणून नस्ती आपल्याकडे सादर केल्याची माहिती सचिवांनी दिली. या प्रशासकीय बाबींचा पत्रात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याची आठवण करून देण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या तुतिकोरिन इथं स्टारलाईट काॅपर उद्योगाला स्थानिकांनी विरोध केला. या विरोधातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ आंदोलक ठार झाले. त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही अशी परिस्तिथी उद्भवू नये, यासाठी वेळीच उपाययोजना करावी, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
भाजप- शिवसेनेच्या शासन काळात अशी घटना घडू नये यासाठी जनभावनेतून नाणार भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी, असा विनंती वजा इशारा शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हेही वाचा-
नाणारवरून जनतेला 'उल्लू बनाविंग'?
अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत अादित्य यांचं मौन
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा