महानगरपालिकेतर्फे पालिका मुख्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडला. पण या कार्यक्रमात विद्युत रोषणाईची संकल्पना मांडणाऱ्या माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांचाच विसर महापालिकेला पडला. विद्युत रोषणाईची मूळ संकल्पना मांडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर ही रोषणाई केली जावी, अशी मागणी करत फणसे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता. पण प्रत्यक्ष या सोहळ्याचे साधे निमंत्रणही त्यांना पाठवले नाही.
या सोहळ्याची दखल भाजपाच्या नगरसेवकांकडून घेण्यात आली नाही. मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. भाजपाचे अतुल शाह, कमलेश यादव, आकाश पुरोहित आणि रिटा मकवाना आदी सदस्य या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी 125 वर्षांच्या चित्राचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्युत रोषणाईचे बटण दाबून त्यांनी याचाही शुभारंभ केला. याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले.
विद्युत रोषणाईने मुख्यालय इमारत झळाळून निघाल्यामुळे खुद्द उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मोबाईलवरून सेल्फी काढून अनोखा क्षण कॅमेरात टिपला.
या सोहळ्यात चक्क माजी महापौरांचाही विसर महापालिकेला पडला. सध्या तीन महापौर सभागृहात असून माजी महापौरांना या सोहळ्याचे निमंत्रण न पाठवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. माजी महापौर दत्ता दळवी यांनी उघडपणे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे नाराजी व्यक्त करत 'किमान या सोहळ्याला तरी माजी महापौरांची आठवण केली जावी', असे सांगितले.
या इमारतीचे प्रत्यक्ष काम सुरू झाले, तेव्हा कोरण्यात आलेल्या मजकुराप्रमाणे फ्रेड्रिक विल्यम स्टीव्हन्स या नावाजलेल्या वास्तुशिल्पकाराने मुख्यालयाच्या इमारतीचे संकल्पनाचित्र आणि आराखडे तयार केले. अभियंता रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या 6600.65 चौ. मी. जमिनीवर ही इमारत बांधली आहे. बांधकामास 11 लाख 19 हजार 969 रुपये एवढा खर्च आला होता. 25 एप्रिल 1889 रोजी इमारतीचे बांधकाम सुरू होऊन 31 जुलै, 1893 रोजी सदर बांधकाम पूर्ण झाले.
ही सर्वांग सुंदर इमारत गॉथिक वास्तुशास्त्र पद्धतीने बांधलेली असून या रचनेत पाश्चात्य आणि पौर्वात्य स्थापत्य कलेचा मनोहारी संगम झाल्याचे दिसून येते. होर्नबी मार्ग आणि कुकशांक मार्ग म्हणजेच आताचे दादाभाई नौरोजी मार्ग आणि महापालिका मार्ग या रस्त्यावरील त्रिकोणी आकाराच्या जागेत विद्यमान इमारत बांधण्यात आली. 235 फूट उंचीचा मनोरा असलेल्या या इमारतीत महापौर आणि महापालिका आयुक्तांसह अनेक अधिकारी आणि समितीची कार्यालये तसेच 68 फूट लांब, 32 फूट रुंद आणि 38 फूट उंचीचे भव्य सभागृह आहे.
सभागृहात 227 तसेच 5 नामनिर्देशित असे एकूण 232 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. सभागृहाच्या उत्तर बाजूस शोभिवंत काचांची विशाल खिडकी असून दुसऱ्या बाजूला सिंहासनावरील मेघडंबरीसारखे कोरीव दगडी कोपरे आहेत. सभागृहाच्या दक्षिणेकडील दरवाजा सदस्यांसाठी असलेल्या मार्गिकेत उघडतो. या मार्गिकेमधून इमारतीच्या दक्षिण प्रवेशद्वारावरील प्रशस्त गच्चीवर जाण्यास काचेचे दरवाजे आहेत. सभागृहात मान्यवरांचे 13 पुतळे बसवले आहेत. ज्या मंडळींनी या इमारतीचे आराखडे बनवले आहेत, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ही इमारत आज 124 वर्षे पूर्ण होऊनही खंबीरपणे उभी आहे. मुंबईच्या 1 कोटी 25 लाख नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा-सुविधा देण्याचे कार्य अखंडपणे येथे सुरू असते. बांधकाम ठेकेदार व्यंकू बाळाजी कालेवार यांनी प्रामाणिकपणे काम करून अपेक्षित खर्चापेक्षाही कमी खर्चात या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले.
हेही वाचा -
विकास आराखड्यावर ३०० नवीन सूचना, पण यादीच तयार नाही?
अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची महापालिका सभागृहाची मागणी