२०१९ वर्ष संपायला आता फक्त काही तासच शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे, हे वर्ष खूप लवकर कसं गेलं हे माहितदेखील पडलं नाही. या सरत्या वर्षात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. या सकारात्मक गोष्टी घडवण्यामागे काही सामाजिक कार्यकर्त्यांचा हात आहे. सरत्या वर्षातच कशाला? गेल्या १० वर्षांत त्यांनी एका चांगल्या कामाला सुरुवात केली आणि त्याचं फळ त्यांना आता मिळत आहे, असं म्हटलं तरी चालेल. अशाच काही सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. ज्यांनी गेल्या एक वर्षात सामाजिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
समाजाला एका उच्च स्थरावर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. या प्रत्येकानं वेगवेगळ्या क्षेत्रात समाज प्रबोधन करण्याचं काम केलं आहे. मुंबईतल्या अशाच काहींची ओळख तुम्हाला करून देणार आहोत जे गेल्या १० वर्षातील हिरो ठरले आहेत.
मुंबईत खड्डे ही एक मोठी समस्या आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे मुंबईकर जास्त त्रस्त असतात. या खड्ड्यांवरून मुंबईकर जास्तीत जास्त काय करू शकतात, तर प्रशासनाला जबाबदार धरू शकतात. पण दोघा मुंबईकरांनी ब्लेम गेम खेळण्यापेक्षा या समस्येवर उपाय शोधला आहे.
माहिममधील इरफान माछीवाला आणि मुश्ताक अन्सारी ही जोडी गेली अनेक वर्ष मुंबईतील खड्डे भरण्याचं काम करत आहे. जिथं-जिथं खड्ड्यांची समस्या आहे तिकडे दोघे जाऊन स्वखर्चानं खड्डे भरायचं काम करतात.
भीक मागणारी मुलं दिसली की आपण त्यांच्या हातावर एक-दोन रुपये टेकवतो किंवा त्यांना हा़डतुड करून पळवून लावतो. पण मुंबईतल्या एका तरूणीनं मात्र या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. कांदिवलीला राहणारी २२ वर्षीय हेमंती सेन रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागून गुजराण करणाऱ्या मुलांना शिक्षण देत आहे.
स्कायवॉकवरच या मुलांची शाळा भरते.
१५ मुलं या शाळेत शिक्षण घेतात. हिंदी, मराठी बाराखडी, नृत्यकला, चित्रकला अशा अनेक गोष्टींचं ज्ञान मुलांना इथून मिळत आहे.
आज तिच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांपैकी ६ मुलांना पालिकेच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे.
रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेनं पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस, दाढी, शरीराचा कुबट वास यामुळे त्यांच्या जवळ जाण्याचं धाडसही कुणी करत नाही. परंतु हे देखील समाजाचा एक भाग आहेत, त्यांनाही नीटनेटके दिसावे, त्यांचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूनं रवींद्र बिरारी हा अवलिया पुढे आला.
समाजानं नाकारलेल्या घटकांचे केस कापण्याचा आणि दाढी करण्याचा विडा उचलला आहे. बिरारी यांचे भांडूप इथं केशकर्तनालय असून गेल्या आठ वर्षांपासून तेही समाजसेवा करत आहेत.
रेल्वे प्रवासात मुलींची छेड काढणं, चुकीचा स्पर्श करणं किंवा त्यांना जाणूनबुजून धक्का मारणं अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याविरोधात दिपेश टँक आणि त्याच्या नऊ मित्रांनी २०१३ साली 'वॉर अगेंस्ट रेल्वे रावडीज' एक मोहीम सुरू केली.
या मोहिमेअंतर्गत दिपेश टँक रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर स्पाय गॉगल घालून वावरायचा. या स्पाय गॉगलच्या मदतीनं दिपकनं छेडछाडीच्या घटना किंवा स्टंट करणाऱ्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीनंच १५० तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
तरूणांच्या अधिक पसंतीस उतरते ती जीन्स.
मग डेनिमची असो वा कुठली दुसरी,
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की,
या जीन्समुळे देखील प्रदूषण होतं.
पण जीन्सपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी एका २७ वर्षांच्या तरुणीनं पुढाकार घेतला आहे.
सौम्या कल्लुरी या तरूणीनं 'द्विज' (Dwij) नावाची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीत टाकाऊ जीन्सपासून चांगल्या आणि टिकाऊ बॅग्स बनवल्या जातात. आतापर्यंत तिनं ३ हजार वापरलेल्या डेनिम जीन्सपासून आणि ५०० मीटर औद्योगिक डेनिमपासून बॅग्स बनवल्या आहेत.
पावसाळा सुरु झाला की रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागतं. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीनं साठवलं गेलं तर पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच कमी होईल. मुंबईच्या सुभजीत मुखर्जी यांनी यावर उपाय म्हणून अनोखी संकल्पना राबवली आहे.
मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटी आणि शाळांमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ हून अधिक शांळांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात त्यांना यश आलं आहे. तर ५० हून अधिक शाळांमध्ये ही यंत्रणा बसवण्याचा त्यांचा मानस आहे.
अंकुश आणि अश्विनी शहा या जोडप्यानं कांदिवली स्टेशनजवळ सुरू केलेल्या स्टॉलवर उपमा, पोहा, थेपले, ढोकळा असे पदार्थ उपलब्ध असतात. या स्टॉलवर शहा जोडपे हे पदार्थ विकत असले तरी हे सर्व पदार्थ त्यांनी नाही तर त्यांच्या घरात जेवण बनवणाऱ्या भावना यांनी बनवले आहेत.
शहा कुटुंब आर्थिक मदत म्हणून भावना यांनी बनवलेले पदार्थ स्टॉलवर विकतात. हे पदार्थ विकून आलेले सर्व पैसे ते भावना यांना देतात. सकाळी लवकर शहा जोडपे अन्नपूर्णा या त्यांच्या स्टॉलवरील सर्व पदार्थ विकतात. त्यानंतर हे जोडपे स्वत:च्या कामाला निघून जातात. शहा जोडपे दोघेही मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करतात. स्टॉल तर ते भावना यांच्यासाठी चालवतात.
८० वर्षीय आबिद सुरती प्रत्येक रविवारी सकाळी ते मिरा रोड इथल्या अपार्टमेंटच्या प्रत्येक मजल्यावर जातात. प्रत्येकाच्या घरा-घरात जाऊन ते एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे, 'तुमच्या घरात नळातून पाणी गळते का?’ जर कुणी हो उत्तर दिलं तर ते त्याच्या घरी प्लंबरला घेऊन जाऊन मोफत नळाची दुरुस्ती करून देतात.
याशिवाय घरा-घरात जाऊन पाण्याचं महत्त्व देखील समजवतात. आतापर्यंत त्यांनी १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यास मदत केली आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे.
एकीकडे आरेत झाडांची कत्तल केली गेली. प्रकाश माने मात्र 'झाडे लावा झाडे जगवा’, हा संदेश देण्यासाठी झटत आहेत. त्यांनी फक्त रिक्षांमध्ये रोपं लावली असं नाही. तर रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांना आणि इतर रिक्षाचालकांना आयुष्यात दोन वृक्ष लावण्याचा सल्ला देतात.
हेही वाचा